शंभर कावळे एकदम बावळे
बसले एका तारेवर
गोंधळ जाम ,
काव काव फार ,
पत्ता नाही कसलाच राव
एक म्हणाला संप करू,
दुसरा म्हणाला का ?
घाबरत घाबरत कुणी म्हणालं "याची गरज आहे तरी का ?"
"कोण म्हणाल गरज नाही ?""तुम्हाला काही समज नाही "
पिंडाचा तो सुका भात खावून झाली निर्बुद्ध जात
करा संप ,नका शिऊ पिंड ,
कळू दे या माणसांना
कावळ्याची जात नाही लाचार
बळी नाही पडणार सुग्रास भोजनाला
शंभर कावळे एकदम बावळे
चर्चा करती जोरात
कधी हो ,कधी ना,
मते शेकडो ना ना
निर्णय झाला अखेर
संपाला नाही पर्याय
संप झाला सुरु ,
तेव्हड्यात आले मयत,
झाले सारे विधी
ठेवला गेला घास
कावळ्या मध्ये मग झाला सुरु कलकलाट
पिंड होता सुग्रास फार ,
नुसता फक्त त्यात भात
कावळे पाहती
नुसते हळहळती,
कसे शिवावे पिंडाला
दुपार झाली
पिंड सुकला ,
माणसे होती खोळंबली
उपाय करती नाना
कावळे काही येई ना
अखेरचा उपाय
किरवंत उठला
निरोप धाडला घरी
धावत आले पोरगे
हातात पिंजरा घेवून
शंभर कावळे एकदम बावळे
बघती टकमक पिंजऱ्याला
चकित सारे
पाहती जेव्हा आतल्या कावळ्याला
शंभर कावळे एकदम बावळे
घाबरले त्या पक्षाला
पिंजरा उघडण्या आधीच धावले
शिवण्या सुक्या पिंडाला
माणसे उठली,
किरवंत सुटला
पिंजऱ्यातला कावळा हसत सुटला
No comments:
Post a Comment