Monday, October 17, 2011

मी एक मेंढरु

भर पावसात चिंब भिजूनही मी सुकाच,
खडकात दबलेल्या बेडकीगत
जगापासून दूर , खूप अलिप्त
तरीही मेंढरागत एकसंघ चालतोय
कुणाच्या तरी पाठीमागे
का कुणास ठाऊक
कदाचित जनरीत म्हणून

बंध झुगारीन म्हणतोय
पण हिम्मत होत नाही
कदाचित अंगात जोर नाही
किवां वेडा म्हणून वाळीत पडण्याची भीती

असं असत्य किती वेळ जगू
की वेडा ठरून आपल्या मार्गाने चालू
विचार करतानाही मी घाबरलोय
आजून ही चालतोय मेंढरागत
कुणाच्या तरी पाठीमागे.

Saturday, August 20, 2011

पंखा १

एकदा पंख्याने स्वतः भोवती फिरायचं नाकारलं
खाडकन आवाज करत पडण्याआधी
त्याला बंद पाडण्यात आलं
सध्या पंखा दुरुस्त होतोय
पुन्हा पूर्वीसारखं स्वतः भोवती तसच फिरण्यासाठी

पंखा २

पंख्याच पातं पंख्याभोवती खुपदा फिरलं
त्याला वाटतंय की त्याने सार जग फिरलंय

Monday, June 20, 2011

भाड मै जाव

प्रेमाच्या या खेळामध्ये सगळे मजनू आंधळे,
गाढवालाही फुटतात मग इश्कचे धुमारे,
म्हैस इथे सुंदर वाटे प्रत्येक रेड्याला
उपचार नाही खर सांगतो आश्या वेडाला.
प्रेमाच्या युद्धात प्रत्येक रोमियो शहीद
फायदा नाही इथे काहीच
घाट्याचा मात्र डोंगर ढीग
म्हणून म्हणतो प्रेमात पडून
नुकसान कश्याला सोसा
ढोसायची आहेच तर मग happy होऊन ढोसा
प्रेमात पडून दुःखी होता कश्याला राव
लुट मजा दुनियेची
प्रेमं बीम बाकी सब भाड मै जाव

Thursday, June 9, 2011

पिंजऱ्यातला कावळा

शंभर कावळे एकदम बावळे
बसले एका तारेवर
गोंधळ जाम ,
काव काव फार ,
पत्ता नाही कसलाच राव
एक म्हणाला संप करू,
दुसरा म्हणाला का ?
घाबरत घाबरत कुणी म्हणालं "याची गरज आहे तरी का ?"
"कोण म्हणाल गरज नाही ?""तुम्हाला काही समज नाही "
पिंडाचा तो सुका भात खावून झाली निर्बुद्ध जात
करा संप ,नका शिऊ पिंड ,
कळू दे या माणसांना
कावळ्याची जात नाही लाचार
बळी नाही पडणार सुग्रास भोजनाला

शंभर कावळे एकदम बावळे
चर्चा करती जोरात
कधी हो ,कधी ना,
मते शेकडो ना ना

निर्णय झाला अखेर
संपाला नाही पर्याय

संप झाला सुरु ,
तेव्हड्यात आले मयत,
झाले सारे विधी
ठेवला गेला घास
कावळ्या मध्ये मग झाला सुरु कलकलाट
पिंड होता सुग्रास फार ,
नुसता फक्त त्यात भात

कावळे पाहती
नुसते हळहळती,
कसे शिवावे पिंडाला

दुपार झाली
पिंड सुकला ,
माणसे होती खोळंबली
उपाय करती नाना
कावळे काही येई ना

अखेरचा उपाय
किरवंत उठला
निरोप धाडला घरी
धावत आले पोरगे
हातात पिंजरा घेवून

शंभर कावळे एकदम बावळे
बघती टकमक पिंजऱ्याला
चकित सारे
पाहती जेव्हा आतल्या कावळ्याला

शंभर कावळे एकदम बावळे
घाबरले त्या पक्षाला
पिंजरा उघडण्या आधीच धावले
शिवण्या सुक्या पिंडाला

माणसे उठली,
किरवंत सुटला
पिंजऱ्यातला कावळा हसत सुटला

Saturday, May 28, 2011

विचार

आज दोन दिवस झाले आजून ही मी विचारच करतोय, पुष्कळ झालं विचार करून आता लिहावच असा निश्चय करून मी लिहायला बसलोय, पण लिहू तरी काय? आजूनही मी भरकटलेलाच आहे माझ्या विचारांत, पण या आधी ही मी विचार करत होतोच की, फक्त आता मी त्यांच्या कडे लक्ष देतोय.विचारांच्या विचाराने मी खूप संभ्रमात पडलोय, खरच आपले विचार भरकटलेले आसवे का ? की आपण ज्याला भरकटलेल म्हणतोय ते भरकटलेल नाहीच , ते आपल्यालाच असं वाटतंय, प्रत्येक गोष्टी ला काही तरी एक अर्थ असतो , मग माझ्या प्रत्येक विचारला ही असायला हवा, मग ते भरकटलेल्या सारखे का वाटतात? का मलाच तसं वाटतंय.पण वाटतंय म्हणजे तरी काय, तो ही एक विचारच आहे की. काही ही असो मी विचार तरी करतोय.

मनात शेकडो विचार भरून राहिलेत, मग कश्या पासून सुरुवात करावी बर, अगदी आताच सुचलेल्या गोष्टी पासून की फार पूर्वीच्या, काही तरी सुरुवात करायला पाहिजे.

पण नेमक लिहाव तरी काय ?
मी आजूनही विचारच करतोय .........

Wednesday, May 25, 2011

भरकटलेला मी

खूप विचार करून तीन चार ओळी सुचल्यावर असं लक्ष्यात आले की मी पहिल्या ओळीच विसरलोय,नेमका मुळचा विषयच विसरल्यावर आता लिहू तरी काय?, मग पुन्हा विचार सुरु केला,"कश्यावर लिहाव बरं?"आणि पुन्हा माझी गाडी भरकटली. विचारांचं हे असच असतं,नेमके कधी भरकटतील याच नेम नसतो, कधी कुठला रोड पकडतील ,आडवाटेने कल्टी घेतील सांगता येत नाही. तसा आता ही मी थोडा भरकटलोय, मग असं भरकटलेलच का बर नको लिहू, काय वाईट आहे त्यात ,एक नव ट्राय, बघूया जमतंय का, आणि नाही जमलं तर काय फरक पडतोय भरकटलेलच तर लिहितोय, चुकलो तरी कोणी फासावर लटकवणार नाही, आही खूप चांगल लिहिलय म्हणून काही मोठा सन्मान ही होणार नाही, मग जिथे काहीच मिळत नाही असा उपदव्याप कश्या करिता. उत्तर सोपं आहे "मला माहित नाही." जसं जमेल तसं लिहिणार,जेव्हा जमेल तेव्हा लिहिणार पण काय लिहिणार ते मात्र माहित नाही आणि तसं ही भरकटलेल्या विचारांना दिशाची माहिती हवी तरी कश्याला, जसं वाहतोय तसं वाहवत जावं, मुक्त राहावं, त्यातच माझं आणि त्याचं भलं आहे.